मौनसंवाद..! तुम्ही कधी निर्जीव वस्तूंशी संवाद साधला आहे का..? मौनसंवादामुळे मला समजले भाज्यांचे अंतरंग !

 मौनसंवाद..! तुम्ही कधी निर्जीव वस्तूंशी संवाद साधला आहे का..?

मौनसंवादामुळे मला समजले भाज्यांचे अंतरंग !

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर.. ✍🏻️








        प्रथम मौन संवाद म्हणजे काय? हे जाणून घेऊ. मौन म्हणजे काहीच न बोलणे आणि संवाद म्हणजे बोलणे. थोडक्यात काही न बोलता संवाद साधणे. पण हा मौनातील संवाद साधायचा कसा?


       खरे तर संवादामुळे नाते छान खुलते... आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, नातेवाईक यांच्या सारख्या अनेकांशी आपण प्रत्यक्ष बोलतो म्हणून संवाद साधणे शक्य होते. मात्र हा मौनात राहून संवाद साधायचा कोणाशी आणि कसा ?


          हा संवाद साधायचा तो असंख्य वस्तूंशी... जसे की आपलं कपाट, शाळा, पेन, सायकल, एखाद झाड किंवा एखादे पुस्तक यांच्याबरोबर. या वस्तू आपल्याशी बोलतात असं समजायचं अन संवाद सुरु करायचा आणि ते संवाद लिहून काढायचे.


        आपल्याच मनाने कल्पना करून स्वतःशीच केलेला संवाद म्हणजे मौन संवाद होय. कल्पना खूप मजेशीर आहे. हळूहळू आपण त्या वस्तूच्या जागी जाऊन विचार करायला लागतो, आतापर्यंत विचार न केलेल्या गोष्टी सुचू लागतात. आपण त्यावस्तूंची नीट काळजी घेऊ लागतो त्याचबरोबर दुसऱ्यांचाही विचार करणारे एक संवेदनशील मन घडू लागते.


बघा प्रयत्न करून. तुमची मुले लहान असतील तर मुलांनाही शिकवा आणि गंमत बघा. मुले देखील त्यांच्या वस्तू नीट हाताळायला लागतील.


Slum Area : आणि झोपडपट्टी बोलू लागली (झोपडपट्टीचे मनोगत)



        मी देखील असाच प्रयत्न केला आणि भाज्यांचे अंतरंग मला समजले. बुधवार आठवडी बाजाराचा दिवस. याबाजरात कमीतकमी तीन तरी पालेभाज्या घेणं होतं, त्यात कोथिंबीर ही ठरलेलीच असते सोबत कधी पालक, शेपू, मेथी तर कधीतरी चवळईची वर्णी लागते. 


        बऱ्याच दिवसात लाल माठ आणि चाकवत घेतलाच गेला नव्हता. बऱ्याचदा चाकवत नसतोच, परवा मात्र कोथींबीरिसोबत लाल माठ आणि चाकवत ही घेऊन घरी आले. त्या निवडण्यासाठी त्यांना पेपरवर काढून ठेवले आणि इतर कामासाठी मी स्वयंपाकघरात गेले.


         थोड्यावेळाने मला अस्पष्ट अशी कुजबुज ऐकू येऊ लागली. घरात तर दुसरे कोणीही नव्हते, मग कोण बोलत असेल म्हणून मी कानोसा घेऊ लागले तर या दोन भाज्या एकमेकींशी बोलत होत्या. आता मी माझे कान टवकारले आणि मी त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागले.


लाल माठ 




लाल माठ : "आज मला किती आनंद झालाय म्हणून सांगू .. अगदी आनंदाने नाचावेसे वाटतेय".



चाकवत 



चाकवत : "हो गं, अगदी खरंय तुझं".


लाल माठ : "खूप खूप वर्षांनी आज हिने मला घरी आणलंय, हिच्या लहानपणी हिला मी खूप आवडायचे. बरीचशी मुलं मला बघितलं कि नाकं मुरडतात पण हिने माझ्यावर प्रेमच केलं नेहमी".


चाकवत : "हो गं, अगदी खरंय तुझं, माझ्यावरही खूप प्रेम करायची".

लाल माठ : "हिला आपण आवडतो म्हणून हिची आजी अगदी आठवणीने आपल्याला घरी न्यायची".


चाकवत : "हो आणि आपल्याला बघितल्यावर तर हि नचूच लागायची".

लाल माठ : "मात्र हिचं लग्न झालं अन हि विसरलीच आपल्याला".


चाकवत : "हो खरंय तुझं. मागे काही वर्षांपूर्वी एक दोनदा आणलं होतं हिने मला घरी, तेवढंच काय ते...".


लाल माठ : "बऱ्याचदा बाजारात दिसायची तेव्हा मी खूप आनंदून जायचे. ती जवळ यायची तेव्हा पटकन तिच्या पिशवीत उडी मारून बसवेसे वाटे, पण हिचं माझ्याकडे लक्षच नसायचं. खूप वाईट वाटायचं तेव्हा".


चाकवत : "हो आणि कोथिंबीर, पालक, मेथी, शेपू ह्या तिच्या ठरलेल्या भाज्या घेऊन निघून जायची".


लाल माठ : "कित्येकदा मला हातात घ्यायची अन परत ठेऊन द्यायची आणि नेहमीच्या भाज्या घेऊन घरी जायची. एवढा हेवा वाटायचा म्हणून सांगू त्या कोथिंबीर, पालक, मेथीचा... काही विचारू नको".


चाकवत : "हो गं, मलापण".

हे सगळं मी कान देऊन ऐकत होते. मी अवाकच झाले. भाज्याही असा विचार करतात तर! मला खूप गिल्टी वाटू लागलं. हळूच मी हॉलमध्ये गेले, माझी चाहूल लागताच दोघीही एकदम चुपचाप झाल्या. पुन्हा मी किचन मध्ये आले तर दोघींची कुजबुज पुन्हा सुरु झाली. मग आतूनच आवाज दिला..


मी : "आले गं मी पण, माझ्याविषयीच बोलताय ना! आपण तिघी मिळून गप्पा मारू".


असे म्हणत मी हॉल मध्ये गेले आणि प्रेमाने दोघींवरून हात फिरवला. त्या दोघींनाही खूप भरून आलं. मी त्यांना उचलून हातात घेतले आणि म्हणाले…


मी : "चुकलंच माझं, बरेच वर्ष झाले मी तुमच्याकडे पाहिलं देखील नाही, परंतु आज माझी चूक तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलीत. Thanks! इथून पुढे मी नक्की काळजी घेईन, निदान महिन्यातून एकदा तरी तुम्हाला नक्की घरी घेऊन येईन".


हे ऐकून त्या दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.  😅😅







• कसा वाटला निर्जीव वस्तूशी साधलेला संवाद "मौनसंवाद..!"


• खरंच भाज्या बोलू लागल्या नां..!


• मग बालमित्रांनो तुम्हीही प्रयत्न करणार ना..


• लेख आवडला असेल तर जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.



धन्यवाद! 🙏🏻


© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर.. ✍🏻️

पुणे. 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या