Daycare for Aaji Aajoba : "आजी आजोबांचे पाळणाघर"

आजी आजोबांचे पाळणाघर .... 

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️

पुणे.



शीर्षक वाचून कुतूहल मिश्रित आश्चर्य वाटलं ना ! माझंही सुरुवातीला असंच झालं होतं, जेव्हा सर्वप्रथम अनुराधा ताईंच्या तोंडून मी हे नाव ऐकलं. त्यांच्या या संस्थेला कधी एकदा भेट देतेय असे झाले होते आणि नुकतीच 3 जानेवारीला संस्थेला आम्ही भेट दिली. तिथे जे काही पाहिले आणि प्रत्यक्ष कानांनी ऐकले ते खूप अदभुत होते. हे सर्व शब्दात बांधून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. अनुराधा ताईंचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर जरूर अनुराधाताईंशी संपर्क साधा. लेखाच्या शेवटी त्यांचा नंबर देत आहे.


मी सौ. सुचिता वाडेकर बाया कर्वे संस्थेची विदयार्थीनी, 'डिप्लोमा इन कौन्सेलिंग सायकोलॉजी' याचा अभ्यास करीत असताना REBT Therapy शिकवण्यासाठी अनुराधा ताई आल्या होत्या. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून 'रेनबो' या संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी रेनबो इन्स्टिट्यूट मध्ये जाण्याचा योग आला. रेनबो म्हणजे सात रंगांनी मिळून तयार झालेला 'इंद्रधनुष्य". या इंद्रधनुष्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रांतातील, जाती धर्मातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने एकमेकांची सुखदुःख वाटून दिवसभरातील आणि आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ आनंदाने एकत्र घालवतात आणि संस्थेचे नांव सार्थ ठरवतात.


Maharshi Dhondo Keshav Karve : महर्षी धोंडो केशव कर्वे


हि संस्था ऑक्टोबर 2015 मध्ये सुरु झाली. रेनबो हि संस्था हि एका संघटनेच्या अंतर्गत चालवली जाते. त्या संघटनेचे नांव आहे Center for Action Research & Education ie. CARE.  या संस्थेच्या निमित्ताने वृद्धाश्रम व घर यांचा मध्य साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. या संस्थेत विविध वयोगटातील आजी-आजोबा येतात. वय वर्षे 62 पासून ते वय वर्षे 88 पर्यंतचे आजी-आजोबा इथे येतात. या वयातील लोकांची बोलणं हि जास्त गरज असते, तसेच सहवासही त्यांना हवासा असतो तो त्यांना इथे मिळतो. काही आजी आजोबा आठवड्यातून एकदा येतात, तर काही आठवड्यातून दोनदा येतात तर काहीजण रोज येतात.


हल्लीच्या आधुनिक युगामध्ये तरुण पिढी हि कामामध्ये अधिक व्यस्त होऊ लागली आहे आणि त्यामुळे घरातील या वृद्धांकडे लक्ष देण्याची गरज भेडसावू लागलीय. काहींची मुले अमेरिकेला असल्यामुळे मुलांना आई-वडिलांची चिंता असते, तसेच दोघांपैकी एकजनाने घेतलेली अचानक एक्झिट मागे राहणाऱ्या दुसऱ्याला अगदी होरपळून टाकते अशावेळी त्यांना एकमेकांच्या साथीची, एकमेकांशी बोलून सुख-दुःख वाटून घेण्याची गरज भासू लागली.

लहान मुलांचे जसे पाळणाघर असते तसेच मोठ्यांचे म्हणजे आजी आजोबांचे ही पाळणाघर काढावे ही भन्नाट कल्पना अनुराधा ताईंना सुचली आणि ती आमलात आणण्यासाठी त्यांना त्यांच्या सारख्याच अवलियांची साथ लाभली. या आजी-आजोबांचा वेळ मजेत जावा, त्यांना गप्पा मारण्यासाठी त्यांच्या वयाचे साथीदार  मिळावेत आणि त्यांचे हे दिवस आनंदात जावेत आणि मुलांना देखील ऑफिस मध्ये निश्चितपणे जाता यावे या उद्देशाने हि संस्था उभारली गेली. या संस्थेचे कार्य गेल्या चार वर्षात खूप छान प्रकारे चालू आहे.

रोजचा दिनक्रम त्यांचा ठरलेला आहे, या दिनक्रमात या जेष्ठांना एवढं बिझी ठेवलंय की त्यांचा दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो हे या आजी आजोबांना कळत देखील नाही. घरी गेल्यावर मात्र दुसऱ्या दिवशीचे नऊ कधी वाजतात याकडे यांचे लक्ष लागलेले असते. दिवसभराचा यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. संस्था सकाळी नऊ वाजता सुरु होते, पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत येण्या-जाण्याची सोयही संस्थेने केली आहे; त्यासाठी 2 व्हॅन आणि 1 कार आहेत.

● 9 वाजता संस्थेत आल्यावर सर्वाना नाष्टा दिला जातो,सात दिवस रोज वेगवेगळा नाष्टा असतो. सर्वांची आवड विचारात घेऊन मेनू ठरवला जातो. खूपदा आजी आजोबा आपली फर्माईश सांगतात तेव्हा त्यांचा मान राखला जातो.

● 9;30 ते 10;00 वाजेपर्यंत पेपर वाचन, एकमेकांशी हाय, हॅलो होतं.

● 10:00 ते 10:45 प्रार्थना, चर्चा, समुपदेशन केले जाते.

● 11:00 ते 12:00 योगा घेतला जातो. यात प्राणायाम, छोटे-मोठे व्यायाम प्रकार, मेडिटेशन, मोठ्याने हसणे यासारख्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या जातात.

● 12:00 ते 12:30 एकत्र वाचन केले जाते जसे की कादंबरी वाचन, नुकतीच त्यांनी मृत्युंजय कादंबरी वाचली.

● 12:30 ते1:15 दुपारचे जेवण होते. डॉक्टरांच्या सल्यानुसार, डाएट प्लॅन प्रमाणे दुपारचे जेवण बनवले जाते. पोळी-भाजी, भात-वरण, ताक इ. तसेच सण असेल त्यादिवशी गोड पदार्थ दिला जातो.

● 1:30 ते 3:00 वामकुक्षी (दुपारची झोप) त्यासाठी त्यांना प्रत्येकासाठी कॉटची सोय केली आहे. सोबत उशी, चादर ही असते.

● 3:15 वाजता दुपारचा चहा- बिस्कीट होतो.

● 3:30 ते 4:30 ऍक्टिव्हिटी घेतली जाते, हि घेण्यासाठी बाहेरून लोकं येतात. प्रत्येकाचे दिवस ठरलेले आहेत, दरदिवशी वेगवेगळी लोकं येतात. आठवड्यातून एक दिवस पुस्तक वाचनाचा कार्यक्रम असतो, नुकतीच त्यांची मृत्युंजय कादंबरी वाचून झाली, एक दिवस साने गुरुजी कथा मला तर एक दिवस डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, एक दिवस आर्ट आणि क्राफ्ट, एक दिवस बुद्धीला चालना देणारे खेळ घेतले जातात जसे शब्द खेळ. उदा. शेवटचं अक्षर 'श' असणारे शब्द सांगा. एक दिवस पत्ते खेळले जातात, एक दिवस कॅरम, एकदिवस हौजी खेळला जातो. अशाप्रकारे यांना बिझी ठेवले जाते.

● 4:30 वाजता छोटा नाष्टा दिला जातो जसे की लाडू-चिवडा, कधी दडपे पोहे ...


● 5:00 वाजता घरी जाण्याची वेळ होते.

● दर बुधवारी म्युझिक थेरपी असते यात तबला वाजवला जातो, पेटी वाजवली जाते. सायकॉलॉजी थेरपी चा भाग म्हणून म्युझिक थेरपी सुरु केली आहे. आजी-आजोबांना सतत व्यस्त ठेवले जाते त्यामुळे त्यांचा वेळ, दिवस पूर्ण मजेत जातो.

● मराठी, हिंदी सिनेमा बघण्यासाठी इथे प्रोजेक्टरची देखील सोय आहे. शॉर्ट फिल्म साठी आठवड्यातून एक दिवस ठरलेला आहे.

● वर्षतून दोनदा पावसाळा व हिवाळा या दिवसात एकदिवसीय सहल आयोजीत केली जाते.

● तात्पुरती राहण्याची सोय देखील संस्था करते, म्हणजे दोन-तीन दिवस जर आजी- आजोबांकडे बघणारे कोणी नसेल तर अशावेळी आजी- आजोबांना संस्थेत राहता येते. 1 दिवसापासून ते 30 दिवसंपर्यत आजी-आजोबा इथे राहू शकतात. इथे नर्सिंग सोय नाहीये परंतु आजी-आजोबांची औषधे संस्थेत असतात ती त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार दिली जातात. अगदीच इमर्जन्सी आली तर मुलांना फोन लावून कळवले जाते आणि फोन लागलाच नाही तर ताबडतोब मंगेशकर हॉस्पिटल मध्ये नेले जाते व तेथे उपचारांना सुरुवात केली जाते.

● येथे कोणा आजी-आजोबांना अडमिशन घ्यायची असेल तर पाच दिवस आधी सांगावे लागते. आजी-आजोबांनी 2 तास वेळ घालवल्यानंतर त्या आजी-आजोबांच्या परवानगीने त्यांचे अडमिशन निश्चित केले जाते.

रेनबो मध्ये आजी-आजोबांना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर असे जाणवले की ती मंडळी इथे खूप खुश आहेत. काहींनी सांगितले की आम्ही इथे खूप दंगा-मस्ती करतो घरी मात्र शांत असतो. मॅडम आमचे खूप लाड करतात त्यामुळे आम्हाला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं.

आमचे वाढदिवस साजरे केले जातात तसेच प्रत्येक सण साजरा केला जातो त्यामुळे घरी गेलो तरी दुसऱ्या दिवशी नऊ कधी वाजतात याची आम्ही वाट पहात असतो. त्यांचे हे बोल ऐकल्यावर अनुराधा ताईंच्या चेहऱ्यावर एक अनोखं समाधान दिसतं जणू काही त्यांनी घेतलेला हा निर्णय किती सार्थ होता हेच ते सांगत असतं.


निराधार, विकलांग बालकांचे संगोपन आणि पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सोफोशने उचललेले पहिले पाऊल Sofosh : सोफोश' अनाथांचे माहेरघर


इथे या आजी-आजोबांच्या सेवेसाठी 3 मावशी आणि 3 समाजसेविका आहेत. ज्या आजी आजोबांची औषधे सुरु आहेत त्यांना वेळेच्या वेळी औषधे दिली जातात. शनिवारी हाफ डे असतो आणि रविवारी संस्थेला सुट्टी असते. नुकतेच पौड येथील लवळे या गावात 'विरंगुळा सेंटर' या नावाने सुरु केले आहे. येथे दर गुरुवारी फ्री ओपीडी असते. यासाठी रेनबो संस्थेतून 2 डॉक्टर, 2 समाजसेवक आणि 1 व्हॅन जाते. इथे वेगवेगळे कॅम्प आयोजित केले जातात. तसेच शरीराबरोबर मनाचे आरोग्य देखील नीट राखले जावे यासाठी छत्रे सभागृहात दर शनिवारी 4 ते 6 यावेळेत मनाची कार्यशाळा (माईंड जीम) सुरु केले आहे. हे लेक्चर फ्री दिले जाते, यासाठी विविध मान्यवर मानसोपचारतज्ञांना बोलावले जाते. बुद्धीला चालना देणारे विविध गेम्स इथे घेतले जातात व त्यावर चर्चा केली जाते व मार्गदशनही केले जाते.

जेष्ठांमधील नैराश्य, भीती, चिंता या भावना तीव्र असतात. त्यांच्या विचार, भावना, वर्तन यामध्ये काहीप्रमाणात बदल घडावा म्हणून माईंड जीम हा अभिनव उपक्रम जेष्ठांसाठी चालवला जातो. विविध कलांच्या माध्यमातून 'स्व' पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो.

आपला उत्तरार्ध आनंदी, समाधानी आणि शांततेचा जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तसेच मेंदू व मन यांच्या विकारांपासून दूर राहता यावे यासाठी माईंड जीम आहे असे अनुराधा ताईंनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, नाट्य, संगीत, कला, नृत्य, सिनेमा, साहित्य, शब्दखेळ या माध्यमातून आम्ही जेष्ठांपर्यंत पोहोचणार आहोत. व्यक्त होणे, मोकळे होणे, शेअर करणे यातूनच ते जमणार आहे. या सर्व कला म्हणजे हे एक 'स्व' पर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे.

माईंड जीम हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून स्वतः ला बदल वत नेण्याचा प्रवास आहे. त्या पुढे म्हणाल्या, सवयीनुसार आपण वागत असतो, या सवयी खूप खोलवर रुतलेल्या असतात त्यामुळे दुसऱ्या वेगळ्या मार्गाचे वर्तन अशक्य वाटू लागते.सवयीचे गुलाम तर आपण होतोच पण या सवयी आजूबाजूच्या लोकांनासुद्धा जाचक होऊ शकतात.

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असा समज आहे परंतु ते तसेच असायला पाहिजे असे नाही, त्यामुळे दृष्टिकोन मोठा करणे, त्यात लवचिकता आणणे आणि आपले जगणे स्वतः साठी आणि इतरांसाठी देखील सुकर करणे हे माईंड जीमचे उद्धिष्ट आहे.

संकटे आल्यावर धडपड करण्यापेक्षा ती संकटे येऊच नयेत यासाठी वर्तमानात केले गेलेले प्रयत्न पूर्वक प्रयत्न म्हणजे हे माईंड जीम आहे असे मला वाटते. इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचे मत, विचार मांडण्याची संधी मिळते, ते विचार इथे आवर्जून ऐकले जातात त्यामुळे पूर्ण हॉलमध्ये चैतन्यमयी वातावरण तयार होते त्यामुळे अनुराधा ताई आणि त्यांची टीम जेष्ठांसाठी करत असलेले कार्य खूप स्पृहनिय आहे. अशा या कार्यात जर कोणाला सहभागी व्हायचे असेल तर त्यांचे स्वागत.

अनुराधा ताई पुढे म्हणाल्या की त्यांना पुणे शहरात अशा विविध ठिकाणी शाखा उभारायच्या आहेत, यासाठी त्यांना जागेची आवश्यकता आहे. त्या पुढे म्हणाल्या, ज्यांचे आजी आजोबा एकटे राहतात (मुले दूर देशी असतात) आणि त्यांच्याकडे बघणारे कोणी नाहीये अशा आजी आजोबांची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ आणि त्या बंगल्याचे भाडेही त्यांना देऊ फक्त अट एकच आहे त्यांचा बंगला ग्राउंड फ्लोअरला असावा.

या लेखामार्फत मी तुम्हाला असे आवाहन करते की जर तुमच्या पाहण्यात अथवा ओळखीत जर असे आजी आजोबा असतील तर त्यांच्या पर्यंत हि माहिती नक्की पोहोचवा आणि अनुराधा ताईंच्या या कार्यात खारीचा हातभार लावा.

जे कोणी इच्छुक असतील त्यांनी जरूर अनुराधा ताईंशी संपर्क साधावा.

अनुराधा करकरे

फ्लॅट 1 अँड 5, मंदाकिनी अपार्टमेंट,

प्लॉट नं. 21 सर्वे नं. 7818,

भुसारी कॉलनी लेफ्ट,

कोथरूड,  पुणे - 411021

मो. - 9373314849

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️

पुणे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या