Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-१०) "तारुण्यावस्था" तारुण्यावस्था (पूर्व प्रौढाअवस्था) - कालावधी : २१ वर्षे ते ४० वर्षे पर्यंत

 पालकत्व निभावताना... (भाग-१०)

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
२४.०४.२०२०




मागील भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.

मागील भागात(भाग-९) आपण "किशोरावस्था" पहिली... खालील लिंकवर ⤵️

 पालकत्व निभावताना... (भाग-९) "किशोरावस्था"


या भागात आपण "तारुण्यावस्था" पाहणार आहोत. 

८. तारुण्यावस्था (पूर्व प्रौढाअवस्था) - 
कालावधी : २१ वर्षे ते ४० वर्षे पर्यंत 

साधारणपणे २० ते ४० वयोगटातील व्यक्ती प्राथमिक प्रौढ गणली जाते. यातील २० ते ३० वयोगटातील व्यक्ती तरुण म्हणून आपण ओळखतो. तरुणपणी व्यक्ती शारीरिक दृष्टया सर्वाधिक सक्षम असते. तिशीत प्रवेश केल्यावर व नंतरच्या काळात तब्बेतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी सुरु होतात. आतापर्यंत शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केलेले असेल तर त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागतात.

● तारुण्यावस्थेची(पूर्व प्रौढाअवस्था) वैशिष्ट्ये -

१. शारीरिक बदल - प्रारंभिक प्रौढावस्थेत शारीरिक बदलांचा वेग मंदावलेला असतो.
उंची - स्त्रियांची उंची १८ व्या वर्षी स्थिर होते तर पुरुषांची उंची २० व्या वर्षी स्थिर होते.
वजन - स्त्रियांच्या वजनात साधारणतः ७ किलो वाढ होते तर पुरुषांमध्ये साडे सात किलो इतकी वाढ होते.

वयाच्या १९ ते २६ वर्षे दरम्यान पोट, हृदय, फुफ्फुस,यकृत यामध्ये कमालीचे सामर्थ्य आणि क्षमता प्राप्त झालेली असते. मेंदू देखील अति कार्यक्षम झालेला असतो त्यामुळे सर्व ज्ञानेंद्रिये व्यवस्थित कार्यरत राहतात.

वयाच्या २० ते ३० वर्षे मध्ये अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते. ३० शी नंतर मात्र शरीर मंद पणे वर्धक्याकडे झुकू लागते. याचा अर्थ लगेच काही व्यक्ती म्हातारी होत नाही पण हळूहळू त्या दिशेने पावले पडू लागतात.

वयाच्या ३० शी नंतर स्त्रियांमध्ये केस पांढरे होणे, त्वचेला सुरकुत्या पडणे, रजोनिवृत्तीच्या तक्रारी, शरीराच्या पेशींचा ऱ्हास आदींची सुरुवात होते. परिणामी पेशींची लवचिकता कमी होते मात्र नियमित व्यायाम, सकस आहार आणि जीवनसत्व युक्त जेवण घेतले तर  याचे प्रमाण कमी होते.

२. व्यायाम - आठवड्यातून किमान ५ दिवस रोज अर्धा तास किंवा आठवड्यातून ३ दिवस रोज १ तास व्यायाम केला तर शरीरस्वास्थ्य चांगले राहू शकते. रोज ३-४ कि. मी. भरभर चालणे,सायकल चालवणे, पोहणे, घराची साफसफाई करणे,बागेत काम करणे यानेही शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. व्यायामामुळे हृदयाचे रक्ताभिसरण चांगले होते आणि फुफ्फुसांची कार्यशक्ती वाढून सहनशीलतेचे प्रमाण वाढते.

व्यायामामुळे स्नायू अधिक बळकट बनतात आणि शरीर अधिक लवचिक बनते. हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याचे प्रमाण थांबते. तसेच रोज व्यायाम केल्याने नैराश्य, उदासीनता, चिंता, ताण आदी कमी झाल्यासारखे वाटते. व्यायामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पूर्व प्रौढाअवस्थेत आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते.

३. सृजनशीलता - पूर्व प्रौढाअवस्थेत म्हणजे तरुणपणात सृजनशीलतेला बराच वाव मिळतो. उदा. विचार प्रकट करणे, एखादी गोष्ट नव्याने मांडणे, एखादी समस्या नव्या अंगाने सोडवणे, एखादा नवीन शोध लावणे इ. एखादी जबाबदारी अंगावर घ्यायची ठरवली तर त्याचे परिणाम काय होतील, त्यासाठी काय उपाययोजना करायची याचा विचार व्यक्ती करू लागते. काहीजण मात्र जबाबदारी टाळण्याच्या संधी शोधत असतात किंवा जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतात.

४. स्वःओळख - महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आता पुढे काय हा प्रश्न पूर्व प्रौढाअवस्थेत येतो. आतापर्यंत पूर्णपणे आई वडिलांवर अवलंबून असतात पण इथून पुढे तसे राहणे उचित नाही तर कुटुंबासाठी हातभार लावला पाहिजे हा विचार बळावतो व त्यासाठी प्रयत्न सुरु होतात. कामामुळे व्यक्तीची स्वतंत्र ओळख होते, तिचे स्वतंत्र अस्तित्व दिसू लागते. कामामुळे म्हणजे नोकरी व्यवसायामुळे माणसाला एक दर्जा प्राप्त होतो.

५. जोडीदाराची निवड - याच कालखंडात जोडीदाराची निवड होऊन विवाह देखील होतो त्यामुळे साहजिकच जबाबदारीची जाणीव होऊ लागते. याच काळात ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, यातून जिव्हाळा वाढतो आणि पतीपत्नीमध्ये संबध प्रस्थापित होतात. नोकरी, लग्न करणे,मुले होणे, बढती मिळणे, मुलांचं शिक्षण, लग्न, नातवंड हे चक्र चालू होतं. साधारणतः २० शी नंतर नोकरी, २५ शी नंतर लग्न ३० शीत मुलं आणि ४० शीत नोकरी व्यवसायात स्थिरता येते.

६. अपत्य - विवाहानंतर जोडप्याला महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो तो म्हणजे मुले व त्यांची संख्या. अपत्ये आणि त्यांच्या संख्येचे अगोदरच नियोजन केले असेल तर स्त्रीला गर्भारपण सुसह्य वाटते.

● पूर्व प्रौढाअवस्थेतील धोके - 

१. जॉब समाधान - महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आता पुढे काय हा प्रश्न पूर्व प्रौढाअवस्थेत येतो. इथे जॉब समाधान महत्वाचे आहे अन्यथा ताण येऊ शकतो.

नवीन जॉब शोधणं, तो टिकवणं याचा बऱ्याच वेळा ताण येऊ शकतो. काहींना मिळणारे वेतन अपुरे असल्याने चरितार्थ चालवणे अवघड होऊन बसते अशावेळी धोका निर्माण होऊ शकतो.

काहींच्या कामाचे स्वरूप कंटाळवाणे असते त्यात आनंद मिळत नाही अशावेळी कामाचा उबग येऊ लागतो. बऱ्याचदा कामाचा भार अधिक आणि वेळ कमी असतो त्यावेळी काम पूर्ण करण्यासाठी सततचा तगादा लावल्याने त्रास होऊ लागतो.

काहींच्या बाबतीत बढती होण्याची तसेच पगारवाढी ची शक्यता धूसर होते त्यावेळी ताण येऊ शकतो.

२. लग्न संबंध - याच कालखंडात जोडीदाराची निवड होऊन विवाह होतो. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होता आले नाही तर पतिपत्नी मध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो, तो वेळीच दूर केला गेला नाही तर तो वाढत जाऊन त्याचे पर्यवसन घटस्फोटामध्ये होऊ शकते. त्यामुळे याचाही ताण येऊ शकतो.

आजची स्त्री देखील स्वतःचे स्वत्व, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपण्याचे प्रयत्न करते अशावेळी दोघांनी एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला हवे. एकमेकांचा, एकमेकांच्या कामाचा आदर ठेवायला हवा अन्यथा कौटुंबिक संबध धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे डिव्होर्सचा धोका निर्माण होऊ शकतो मात्र वेळीच सावधतेने पावले उचलली तर हा धोका टळू शकतो.

अशाप्रकारे या भागात आपण तारुण्यावस्था म्हणजे पूर्व प्रौढाअवस्था, तिचा विकास, वैशिष्टये आणि धोके पाहिले.

भेटूयात पुढील भागात..  

९. प्रौढ अवस्था(मध्यप्रौढअवस्था) -  
कालावधी : ४० वर्षे ते ६० वर्षे पर्यंत 

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२४.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या