Gupit : गुपित (लघुकथा) - काही गोष्टी गुपित ठेवणं हे सगळ्यांच्याच हिताचं असतं

 "गुपित".... 

#लघुकथा 

© सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️


फोटो : गुगल सौजन्य 🙏🏻


आज सुधाताई खूप आनंदी आणि समाधानी दिसत होत्या, त्याला कारणही तसेच होते. सुधाताईंचा मुलगा आठवीत असताना सुधाताईंचे पती एका आजारपणात गेले. तेव्हापासून त्यांनी मोठया कष्टाने दिवस काढले. त्यावेळी त्या चाळीत रहात होत्या.


मुलाचं शिक्षण, घरची जबाबदारी त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडली. त्या एका मराठी शाळेत शिक्षिका होत्या त्यामुळे आर्थिक टेन्शन नव्हतं. त्यांचा मुलगा आनंद हा देखील खूप हुशार होता. पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो एका आय टी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होता. सुधाताई ही आता निवृत्त झाल्या होत्या.


दोन वर्षांपूर्वी आनंद ने एक 2bhk फ्लॅट घेतला होता आणि घरगुतीच गृहप्रवेश करून चाळीतून सुधाताई इकडे रहायला गेल्या होत्या. आज या गोष्टीला 2 वर्षे पूर्ण झाली होती. त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते आणि म्हणूनच त्या समाधानी आणि आनंदी होत्या.


गृहप्रवेशाच्या वेळी चाळीतील कोणालाही त्यांनी मुद्दामच बोलावले नव्हते. काही दिवसांपूर्वी चाळीतील वत्सलाबाईंना कुणकुण लागली आणि त्या माग काढत आल्याच.


सुधाताईंच्या मुलाने घेतलेले घर पाहून वत्सलाबाईंचा चेहरा उतरला हि गोष्ट सुधाताईंच्यानजरेतून सुटली नाही. त्यांनी असे दुःखी घरी जाऊ नये असे मनातून सुधा ताईंना वाटत होते.


• असं सासर सुरेख बाई.. खरंच या प्रेमाला उपमा नाही. असं प्रेम प्रत्येकीला मिळालं तर..!


त्यांनी वत्सलाबाईंना चहा दिला आणि त्यांच्या शेजारी बसल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या आणि मोठ्या काळजीने म्हणाल्या, 


"अहो वत्सलाबाई, मला तर इकडे आल्यापासून रात्र-रात्र डोळ्याला डोळा लागत नाही हो". 


"का हो काय झालं?", वत्सलाबाईंनी डोळे विसफारून मोठ्या उत्सुकतेने विचारले.


मोठा दुःखीत चेहरा करत सुधाताई म्हणाल्या,


"अहो, काय सांगू तुम्हाला, नवीन घर घ्यायच्या नादात मुलाने भलं मोठं कर्ज काढून ठेवलंय, आता त्याचे हप्ते फेडताना नाकीनव आलंय."


"आपलेच दात आणि आपलेच ओठ, काय करायचं... अन कोणाला सांगायचं, तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतेय अन गप कुढत बसलेय झालं".. सुधा ताई.


हे ऐकून वत्सलाबाईंचा चेहरा खुलला, त्यांना मनातून खूप आनंद झाला होता. आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या म्हणा ना. त्या खुशीतच त्यांनी सुधाताईंनी दिलेला चहा संपवला आणि लगबगिने निघाल्या.


कविता : My favorite fruit : Mango माझं आवडतं फळ 'आंबा'


कधी एकदा चाळीत जाऊन हि बातमी सगळ्यांना देतेय असे त्यांना झाले होते. वत्सलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून सुधाताईंनाही हायसे वाटले. 


आनंद आतल्या खोलीतून हे सगळं ऐकत होता. त्याला आईचं हे वागणं जरा विचित्रच वाटलं. वत्सलाबाई गेल्यावर तो बाहेर आला आणि त्याने सुधाताईंना विचारले,


"आई, आपल्याला आजिबात कर्ज नाही हे तुला सगळं माहीत असताना तू खोटं का सांगितलंस?"


त्यावर सुधाताई म्हणाल्या, "अरे, माझ्या बोलण्याने त्या किती सुखवल्या हे पाहिलेस ना तू.. "


"पण जर मी खरे सांगितले असते तर त्या दुःखी मनाने घरी गेल्या असत्या आणि हे मला नको होते".


"दुसऱयांच्या दुःखात आनंद शोधणाऱ्या लोकांच्या आनंदासाठी कधी कधी आपण खूप दुःखात असल्याचे नाटक करावे लागते बाळा".. सुधाताई.


"आई तू पण ना.. सगळ्यांचा किती विचार करतेस " आनंद. 


"अरे बाबा! काहीवेळा काही गोष्टी गुपित ठेवणं हे सगळ्यांच्याच हिताचं असतं".. सुधाताई. आनंदलाही हे पटले.


आपल्या आजूबाजूला जेव्हा अशा व्यक्ती आपण बघतो तेव्हा माणसांच्या या स्वभावाचे कंगोरे प्रत्यक्षात दिसत नसले तरी ते असतात आणि ते जाणवतात तेव्हा अशा माणसांपासून लांब रहाणे केव्हाही योग्यं असेच वाटते.


काय मग तुम्हालाही भेटलीत का कधी अशी माणसं..?


• कशी वाटली कथा..


• आवडली का..


• कथा आवडल्यास कमेंट करा, फॉलो करा.


• आणि कथा शेअर करावीशी वाटल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित.


• कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या